Weather Alert: या जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता ; 24 जिल्ह्यांना अलर्ट

Spread the love

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावण्याचे संकेत भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचबरोबर शनिवारी, 13 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील एकूण 24 जिल्ह्यांना पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. त्यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये हवामान बदलणार असून, या भागातील काही ठिकाणी हलक्या सरी तर काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा देखील इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकरी, नागरिक आणि प्रवाशांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन भारतीय हवामान खात्याने केले आहे.

कोकण विभागातील स्थिती

कोकण विभागामध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्याचबरोबर पालघर, ठाणे व मुंबई परिसरात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रायगड आणि रत्नागिरी मध्ये मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची देखील शक्यता आहे व यलो अलर्ट देखील करण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल अशी हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे . या भागात हवामान खात्याने यलो अलर्ट दिलेला आहे. पुणे व घाटमाथा परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे

मराठवाडा विभागात

मराठवाड्यातही हवामानामध्ये बदल होणार आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. तर परभणी, बीड, हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असून, येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्र विभाग

उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव व नाशिक जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. नाशिक घाटमाथा भागातही अशीच स्थिती राहील. तर अहिल्यानगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज सांगण्यात आला आहे, भारतीय हवामान खात्याने येथे यलो अलर्ट जारी केला आहे.

विदर्भ मध्ये

विदर्भा मधील जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम राहणार आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा आणि नागपूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस अपेक्षित आहे.
तर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

नागरिकांना सावधानतेचा इशारा

13 सप्टेंबर रोजी राज्यातील विविध भागांत पावसाचा जोर कायम राहणार आहे. काही ठिकाणी हलका पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार देखील पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. विशेषत: कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांत दिलेल्या अलर्टमुळे शेतकरी, नागरिक आणि प्रवाशांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असून, ग्रामीण भागासह शहरी भागातील दैनंदिन कामकाजावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *