जायकवाडी धरणाचे २७ दरवाजे उघडले; १ लाख १३ हजार १८४ क्युसेक पाण्याचा विसर्ग ; गोदावरीला मोठा पूर

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

छ. संभाजीनगर :
मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम सुरू आहे. जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह पैठण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे रविवारी (१४ सप्टेंबर) रोजी पहाटे जायकवाडी धरणाचे सर्व २७ दरवाजे उघडून तब्बल १ लाख १३ हजार १८४ क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सोडण्यात आले.

Amazon

Amazon App Player

Download Now

पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत आणि उपअभियंता मंगेश शेलार यांच्या उपस्थितीत हा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे गोदावरी नदी सध्या दुथडी भरून वाहत असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे

शनिवारी रात्रीपर्यंत धरणातून मर्यादित प्रमाणात पाणी सोडले जात होते. मात्र, वरच्या धरणांतून अचानक मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक (८६ हजार ४८९ क्युसेक) सुरू झाल्याने पाटबंधारे विभागाने तातडीने विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने (१५२२ फूट) भरल्याने सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत.

दरम्यान, हवामान विभागाने मराठवाड्यात पुढील २४ ते ४८ तासांमध्ये आणखी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः परभणी, धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे. सोबतच, ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटाचाही इशारा देण्यात आलेला आहे.

पावसामुळे धरणे भरत असली, तरी याचा परिणाम नदीकाठच्या गावांवर गंभीर होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच प्रवास करावा अनावश्यक प्रवास टाळावा, वीज कडकडाटाच्या वेळी झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबू नये, असे आवाहन हवामान विभागासह जिल्हा प्रशासनाने केले आहे.

शेतकऱ्यांना देखील पिकांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सततच्या पावसामुळे रोगराईचा धोका वाढू शकतो. दरम्यान, गोदावरी नदीतील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे नदीकाठच्या गावांमध्ये धाकधूक निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now