शेतकऱ्यांची राहणार उपस्थिती, दोन दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग
केज:
केज, अंबाजोगाई, धारूर, लातूर, कळंब या शहरासह ६१ गावांची तहान भागवणारे व मांजरा पट्ट्यातील पाच तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली आणणारे केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण १०० टक्के भरले आहे.आज सकाळी दहा वाजता खा.बजरंग सोनवणे यांच्या हस्ते धरणातील पाण्याचे जलपुजन करण्यात येणार आहे.

लातूर शहर, लातूर औद्योगिक वसाहत, केज, अंबाजोगाई, धारूर, कळंब या शहराससह ६१ गावे मांजरा धरणातील पाणी पुरवठ्यावर निर्भर असतात. मांजरा धरण पिण्याचे पाण्याबरोबर शेती पिकांना लागणाऱ्या पाण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे. धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्या अंतर्गत बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील ७३ गावातील १८ हजार २२३ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येते. डावा कालवा ९० कि.मी. अंतराचा आहे. त्यातून १०,५५९ हेक्टर शेती तर, उजवा कालवा ७८ कि.मी.चा असून त्याअंतर्गत ७६६५ हेक्टर शेती सिंचनाखाली येते. खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामासाठी सरासरी १८५ दलघमी पाण्याचा वापर होते. याशिवाय केज व कळंब तालुक्यातील २७ गावातील शेतकऱ्यांना मांजरा धरणाच्या बॅकवॉटर पाण्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ होतो. तसेच धरणातील पाण्यावर बिगर सिंचन योजना सुध्दा २१ आहेत तर पिण्याच्या पाणी योजना १६ कार्यरत आहेत. नागरिकांना पिण्यासाठी सरासरी ६१.९३ दलघमी एवढे पाणी आरक्षित ठेवण्यात येते. पाण्याच्या सिंचनाच्या व औद्योगिक दृष्ट्या मांजरा धरण अतिशय महत्त्वपूर्ण आहे. मागील काही दिवसांपुर्वी धरण पुर्णपणे भरले होते. यानंतर सहा दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले होते. आता चार दरवाजे बंद करण्यात आले असून दोन दरवाज्यातून ४९.४८ क्यूसेक्सने मांजरा नदी पात्र पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मांजरा धरणामुळे केज तालुक्यातील मोठ्या प्रमाणात हरीतक्रांती झालेली असून आज खा.बजरंग सोनवणे यांच्या हस्ते जलपुजन होत आहे.
००
मांजरा धरणाची संक्षिप्त माहिती
-प्रकल्पीय क्षेत्र ४५ चौरस किमी.
-पूर्ण संचयी पाणीपातळी ६४२.३७ मीटर
-प्रकल्पीय एकूण पाणीसाठवण क्षमता २२४.०९३ दलघमी.
-मृत पाणीसाठा ४७.१३० दलघमी.
-उपयुक्त (जिवंत) पाणीसाठा क्षमता १७६.९६३ दलघमी.