Ladki Bahin Yojana राज्यात सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेबाबत महत्त्वाची हालचाल सुरू झाली आहे. आचारसंहिता लागू असतानाही या योजनेचा हप्ता वितरित करण्यास कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट झाले असून, यावेळी महिलांना दोन महिन्यांचे अनुदान एकत्र दिले जाण्याची शक्यता आहे.

राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपयांचे अनुदान दिले जाते. सध्या निवडणुकीच्या कालावधीत नियमित हप्ता देताना अडथळे येऊ नयेत, यासाठी दोन महिन्यांचे अनुदान एकत्र देण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू आहे. यासाठी आवश्यक आर्थिक तरतूदही करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.Ladki Bahin Yojana मात्र, अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. महापालिकांच्या मतदानाच्या दोन ते चार दिवस आधी हा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, आचारसंहितेमुळे अनुदान वितरणाला अडथळा येईल का, याबाबत उपस्थित झालेल्या शंकांवर राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट भूमिका मांडली आहे. ‘लाडकी बहीण योजना आधीपासून सुरू असल्याने निवडणूक काळात तिच्यावर कोणताही प्रतिबंध लागू होत नाही. अनुदान वितरणाशी आचारसंहितेचा काहीही संबंध नाही,’ असे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले आहे. सध्या राज्य शासनाकडून आयोगाकडे कोणतीही अधिकृत विचारणा करण्यात आलेली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, या योजनेतील बोगस लाभार्थ्यांवर आळा घालण्यासाठी सरकारने केवायसी अनिवार्य केली आहे. Ladki Bahin Yojana महिला व बाल विकास विभागाच्या माहितीनुसार, योजनेतील एकूण 2 कोटी 42 लाख लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत केवळ 1 कोटी 60 लाख महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित महिलांनी 31 डिसेंबरपर्यंत केवायसी न केल्यास त्या योजनेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
यापूर्वी काही ठिकाणी बोगस लाभार्थी, शासकीय कर्मचारी तसेच पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे प्रकार उघडकीस आले होते. त्यामुळे केवायसी बंधनकारक केल्याने अशा अपात्र लाभार्थ्यांवर आपोआप गाळणी लागणार आहे. सूत्रांच्या अंदाजानुसार, केवायसी पूर्ण न झाल्यास या योजनेतील सुमारे 50 ते 60 लाख लाभार्थी कमी होऊ शकतात.
एकूणच, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत महिलांमध्ये उत्सुकता असून, दोन महिन्यांचे अनुदान एकत्र मिळाल्यास अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.