राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका अखेर दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय झाला आहे. काही जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची ५० टक्क्यांची घटनात्मक मर्यादा ओलांडली गेल्याने एकाच टप्प्यात निवडणूक घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ३२ जिल्हा परिषद आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन टप्प्यात पार पडणार आहेत.

पहिल्या टप्प्यात आरक्षणाची मर्यादा न ओलांडलेल्या १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी पूर्ण केल्या जाणार आहेत. उर्वरित २० जिल्हा परिषद आणि संबंधित पंचायत समित्यांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशानंतर दुसऱ्या टप्प्यात घेण्यात येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयोग मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
१७ जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाचा पेच
ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या १७ जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे. याशिवाय अहिल्यानगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांतील ८८ पंचायत समित्यांमध्ये ओबीसी आरक्षण २७ टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणच्या निवडणुका न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतरच होतील.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
सर्वोच्च न्यायालयाची मुदत ३१ जानेवारीपर्यंत
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत ३१ जानेवारीपर्यंत आहे. त्यामुळे या मुदतीत बसणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका वेळेत पूर्ण करण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे. “३१ जानेवारीपूर्वी पहिल्या टप्प्यातील निवडणुका पूर्ण होतील,” असा विश्वास आयोगाने व्यक्त केला आहे.
पहिल्या टप्प्यात ‘या’ १२ जिल्हा परिषदा
पहिल्या टप्प्यात सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदांची तसेच त्या जिल्ह्यांतील १२५ पंचायत समित्यांची निवडणूक होणार आहे.
५ जानेवारीपासून अर्ज भरण्याची शक्यता
जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजणार आहे. आयोगाच्या प्राथमिक नियोजनानुसार ५ जानेवारीपासून उमेदवारांना अर्ज भरता येण्याची शक्यता आहे. ज्या जिल्ह्यांत सध्या निवडणुका नाहीत, तेथील अधिकारी उपलब्ध करून अवघ्या २१ दिवसांत १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्याची तयारी करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्याचा थोडक्यात आढावा
एकूण जिल्हा परिषदा: १२
निवडणूक कालावधी: २१ दिवस
संभाव्य तारखा: ५ ते २७ जानेवारी
दरम्यान, आरक्षणाचा पेच सुटलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात घेतल्या जातील. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे मार्गदर्शन मागितले असून, पुढील आदेशाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.