राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन १४ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. मात्र १४ डिसेंबर २०२५ हा रविवार असल्यामुळे सरस्वती न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल, बर्दापूर येथे 13/12/2025 रोजी ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
बर्दापूर :
ऊर्जेचा वाढता वापर आणि भविष्यात निर्माण होणारी ऊर्जा टंचाई लक्षात घेता ऊर्जा बचतीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी सरस्वती न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल, बर्दापूर येथे राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. मधुकर जाधव होते.

कार्यक्रमास आदर्श मैत्री फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष मा. पप्पू बाहेती तसेच दैनिक सकाळचे प्रतिनिधी मा. गोविंद सूर्यवंशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मंचावर अमोल भडके, महेश भारती, चंद्रकांत चिल्लारगे, राहुल राठोड यांच्यासह शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होता.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ऊर्जा संरक्षणाचा संदेश देणारे विविध उपक्रम सादर केले. विद्यार्थ्यांनी ऊर्जा बचतीविषयक पोस्टर प्रदर्शित करत “ऊर्जा वाचवा – भविष्य वाचवा”, “आज ऊर्जा बचत, उद्याचे सुरक्षित जीवन” अशा घोषवाक्यांच्या घोषणाबाजी केली. या घोषणांमुळे संपूर्ण शाळा परिसर ऊर्जा संरक्षणाच्या संदेशाने भारावून गेला.

यावेळी विद्यार्थ्यांना ऊर्जा संरक्षणाची शपथ देण्यात आली. अनावश्यक विजेचा वापर टाळणे, ऊर्जा कार्यक्षम साधनांचा वापर करणे, पर्यावरणपूरक ऊर्जास्रोत स्वीकारणे आणि भविष्यातील पिढीसाठी ऊर्जा जपण्याची जबाबदारी स्वीकारणे, असा आशय या शपथेमध्ये होता.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक मा. श्री. मधुकर जाधव यांनी ऊर्जा बचत ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. “ऊर्जा ही केवळ सुविधा नसून ती जबाबदारीने वापरणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने ऊर्जा संरक्षणाची भूमिका घेतली तर देशाचे भविष्य सुरक्षित राहील,” असे ते म्हणाले.

प्रमुख पाहुणे मा. पप्पू बाहेती यांनी ऊर्जा संरक्षणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. तर मा. गोविंद सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच ऊर्जा बचतीची जाणीव निर्माण होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी श्रेया गायकवाड यांनी केले. त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण व सुबक सूत्रसंचालनामुळे कार्यक्रम अधिक प्रभावी ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अर्पिता कुलकर्णी, निकिता शिंपले, संगीता धुमाळ, सुनिता सोनवणे, सीमा कोरडे, पंकजा पवार, समिना अत्तार, जना माने, अमोल भडके तसेच मावशी सुमनबाई जोगदंड यांच्यासह सर्व शिक्षकवृंदाने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन शिक्षिका अर्पिता कुलकर्णी यांनी केले.