बीड : Beed Crime News जिल्ह्यातील केज तालुक्यात पुन्हा एकदा दहशत माजवणारी घटना घडली आहे. सांगवी गावात जमिनीच्या किरकोळ वादातून एका महिलेला आणि तिच्या मुलाला गावगुंडांनी भर रस्त्यात अमानुष मारहाण केल्याने परिसरात संताप उसळला आहे. ही घटना ५ डिसेंबर रोजी घडली असून हल्ल्याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महिलेची गंभीर अवस्था असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. “तक्रार का केली?” असा सवाल करत आरोपींनी लोखंडी आणि लाकडी वस्तूंनी आई-मुलाला बेदम मारहाण केल्याचा आरोप समोर आला आहे. यापूर्वीही त्रास दिल्यानंतर पीडितांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती, मात्र त्याचाच राग मनात ठेवून आरोपींनी पुन्हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
पोलिसांवर हलगर्जीपणाचे आरोप
या प्रकरणात पीडित केदार कुटुंबाने पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. “आम्ही आधीच तक्रार दिली होती, पण कारवाई झाली नाही. जर आरोपींवर कारवाई केली असती तर आज ही वेळ आली नसती,” असे पीडित महिलेनं सांगितलं. कुटुंबाला सतत जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असून गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, आरोपींना अद्याप अटक न झाल्याने स्थानिकांत असंतोष वाढला आहे. केज पोलीस ठाण्याच्या निष्क्रियतेमुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला महिलेला ओढत नेत निर्दय मारहाण करत असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.
कडक कारवाईची मागणी
या घटनेनंतर गावकऱ्यांनी आणि पीडित कुटुंबाने आरोपींवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. “चौकशी सुरू आहे,” असे पोलिसांनी सांगितले असले तरी, “ठोस पावले न उचलल्यास अशा घटना पुन्हा घडण्याची भीती आहे,” अशी भावना व्यक्त होत आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मारहाणीच्या घटना वाढत असून कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिकांनी प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून, अन्यथा अशा दहशतीच्या घटना थांबणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे.