मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पूरग्रस्त पाच गावांमध्ये ब्लॅंकेट चे वाटप
माजलगाव :
बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने आणि तलावातील पाणी सोडल्याने अनेक गावांचे मोठे नुकसान झाले. याबरोबर गोदाकाठ आणि सिंदफणा काठावरील शेतकऱ्यांचे ही मोठे नुकसान झालेले आहे. अनेकांची घरे वाहून गेली. अनेकांची घरे पडली. शेतकऱ्यांची शेती नेस्तनाबूत झाली. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शक्य होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने करण्यात आला. माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तम पुरी, मंजरथ, डेपेगाव, सांडस चिंचोली, आळसे वाडी, गंगामसला या ठिकाणी परिषदेच्या वतीने गरजूना

ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख सर यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त देशमुख म्हणाले की पत्रकार हा समाजाचा घटक असतो आणि सामाजिक बांधिलकी म्हणून आमच्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे आम्ही शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मदत करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने आणि तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या. अनेकांची पिके नेस्तनाबूत झाली. अनेकांची घरे पडली.सांडस चिंचोली सारख्या गावांमध्ये तर संपूर्ण गावाला पाण्याचा वेढा पडला होता. अशा परिस्थितीत लोकांचा संपर्क तुटल्याने लोकांना वाचवणे हा मोठा प्रश्न होता. अनेकांना एनडीआरएफ च्या पथकाने बाहेर काढले. तशीच परिस्थिती देपेगाव,सांडस चिंचोलीची होती. या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात गावामध्ये पाणी घुसले आता परिस्थिती पूर्व पदावर येत असून शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना धान्यापासून ते वस्तू पर्यंत सर्वच गोष्टीच्या मदतीची गरज आहे. अशा परिस्थितीत मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी, डेपेगाव, मंजरथ ,सांडस चिंचोली, आळसेवाडी, गंगामसला या गावांमध्ये ब्लॅंकेट चे वाटप करून काही प्रमाणात का होईना पूरग्रस्तांना दिलासा दिला. यावेळी बोलताना एस.एम.देशमुख म्हणाले की मराठी पत्रकार परिषदेने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. मराठवाडा आणि सोलापूर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सोलापूर आणि मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये शक्य होईल तेवढी मदत देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. याच पार्श्वभूमीवर बीड तालुक्यातील या पाच गावांना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात येत आहे. परिषदेच्या वतीने पत्रकारांचे प्रश्न तर सोडवण्यासाठी संघर्ष केला जातोच त्याबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून शेतकऱ्यांना शक्य होईल तेवढी मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव रवी उबाळे, विभागीय समन्वयक सुभाष चौरे, जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके, डिजिटल मीडियाचे राज्याचे अध्यक्ष अनिल वाघमारे, माजलगाव तालुका अध्यक्ष हरीश यादव, पत्रकार पांडुरंग उगले, धनंजय माने, सुहास बोराडे, धम्मपाल डावरे या पत्रकारांसह गावातील सरपंच, चेअरमन, प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.