बैलगाडी, दुचाकीवर बसून घेतल्या नुकसानग्रस्तांच्या भेटी
आधीच जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नद्या दुथडी वाहत असताना जायकवाडी धरणातून ३ लाख क्यूसेस पाणी सोडण्यात आले. परिणामी, गोदावरीच्या पाण्याने माजलगाव तालुक्यातील अनेक गावांना घेरले आहे. दि.३०सप्टेंबर रोजी खा.बजरंग सोनवणे यांनी पाण्यात असलेल्या गावात जावून पुरग्रस्तांचे आश्रू पुसले. यावेळी पुराच्या पाण्यातून गावात जाण्यासाठी त्यांनी बैलगडी, दुचाकीचाही वापर केला.

बीड जिल्ह्यात दि.१४ सप्टेंबरपासून पाऊस आहे. मध्यल्या काळात अनेकदा अतिवृष्टी झाली. यामुळे सर्वच नद्यांना महापूर आला. नद्यांचे पाणी काही प्रमाणात कमी झाली झाले असताना जायकवाडी धरणातून दोन दिवसांपुर्वी ३ लाख क्यूसेस पाणी सोडण्यात आले. २००६ नंतर पहिल्यांदाच इतके पाणी सोडण्यात आले होते. यामुळे माजलगाव तालक्यातील अनेक गावे पाण्यात आहेत. अनेक गावांना जाण्यासाठी रस्ता राहिलेला नसून मुख्य रस्त्यावर पाणी आहे. दि.३० रोजी सकाळी खा.बजरंग सोनवणे यांनी सकाळी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सुरूवात केली. माजलगाव तालुक्यातील टाकरवण, शेलगावथडी, रिदोरी, कवडगावथडी, राजेगाव, हिवरा, काळेगावथडी, महातपुरी, पुरूषोत्तमपुरी, जायकोचीवाडी, सादोळा आदि गावात भेटी दिल्या. यातील अनेक गावातील रस्त्यावर पाणी आहे. सदरील पाण्यातून जाणे मोठे जिकीरीचे काम आहे. परंतु खा.बजरंग सोनवणे यांनी नागरिकांच्या भेटी घेण्यासाठी कवडगावथडी येथे बैलगाडी वापरली. तर काही ठिकाणी दुचाकीवरून प्रवास करत पाण्यातून वाढ काढली. त्यांनी गावात भेट दिल्यानंतर त्यांनी महिला-पुरूषांशी संवाद साधत, गावात पुर आला, संसार भिजला आहे. यामुळे मोठे नूकसान झाले असून यामुळे कोणीही खचून जाऊ नका. तुम्हाला उभा करण्यासाठी आम्ही सरकारकडून मदत मिळवून देऊ, त्यासाठी मी प्रयत्न करत आहे. गावात ज्यांचे घर पाण्यात गेले आहे, त्यांच्या मदतीने आपणच तातडीने जा, त्यांची अडचण समजून घ्या आणि एकेमकांना मदत करा. सरकारी मदत मिळवून देण्यासाठी आम्ही वेळप्रसंगी लढा उभा करू, पण तुम्हाला एकटे सोडणार नाहीत, असा शब्दही खा.बजरंग सोनवणे यांनी दिला. यावेळी त्यांच्यासोबत माजलगाव मतदारसंघाचे नेते मोहन जगताप आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

०
तरूण शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
कवडगावथडी येथे खा.बजरंग सोनवणे हे पोहचल्यानंतर एका तरूण शेतकऱ्यांने रस्त्याशेजारी असलेल्या शेतातील पाण्यात उडी मारली. त्याठिकाणी या शेतकऱ्याचे अडीच एक्कर हळदीचे पिक आहे. त्या शेतकऱ्याने पाण्यात बुडी घेवून हळदीचे पिक उपटून दाखवायला आणले. यानंतर त्या तरूणाला आश्रू अनावर झाले. त्याच्या डोळ्यातील आश्रू पाहून खा.बजरंग सोनवणे यांनी तु काळजी करू नको, तुला उभा करण्यासाठी शासन स्तरावरून मदत मिळवून देतो, त्यासाठी मी तुमच्या पाठिशी आहे, असे म्हणून तरूणाला धीर दिला.