मुसळधार पावसाने पुणे व मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत ; पुण्यात शाळांना सुट्टी

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

पुणे :
पुणे आणि मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते, नाले, महामार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक कोंडी झाली असून पुण्यातील काही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुढील तीन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Amazon

Amazon App Player

Download Now

पुणे जिल्ह्यात वाहतूक ठप्प

पुणे-सोलापूर महामार्गालगत लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी आणि उरुळी कांचन परिसरात रस्त्यांवर गुडघ्याएवढे पाणी साचले. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. अनेक वाहनं पाण्यात अडकली असून काही घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. ओढे व नाले तुडुंब भरून वाहत असल्याने स्थानिक नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

पुण्यात शाळांना सुट्टी

घाटमाथ्यावर झालेल्या पावसामुळे खडकवासला धरण साखळीतील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे मुठा नदीपात्रात विसर्ग वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुणे उपनगरांतील काही शाळांना तातडीने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन पुणे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबईतही पावसाचा जोर

मुंबईत रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे सकाळपासून सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. दादर, बांद्रा, अंधेरी, माटुंगा परिसरातील रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. मुलुंड टोलनाका परिसरातही वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मध्य व हार्बर रेल्वे 20 मिनिटं उशिराने धावत आहेत, तर मोनोरेल्वे तांत्रिक कारणामुळे बंद पडली आहे. इस्टर्न एक्सप्रेसवेवर वाहनं संथ गतीने सुरू आहेत. मात्र मुंबईत अजून शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही.

पुढचे तीन दिवस पावसाचा इशारा

हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकणात 200 तर मध्य महाराष्ट्रात 100 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढचे तीन दिवस नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मान्सून माघारीची चाहूल

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास राजस्थानमधून सुरू झाल्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मान्सून माघारी फिरेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्राथमिक अंदाजानुसार 15 ऑक्टोबरपर्यंत राज्यातून मान्सून पूर्णपणे परतेल.

पुणे व मुंबईत पावसाने आणखी काही दिवस लोकांना सावध राहण्याची गरज आहे. वाहतूक व्यवस्थेवर परिणाम, शाळांना सुट्ट्या आणि नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत करणारा हा पाऊस किती दिवस टिकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now