कोल्हापूरच्या सायबर चौकात मंगळवारी सायंकाळी घडलेल्या अपघाताने सर्वांना स्तब्ध केले. सिग्नलवर थांबलेल्या कारवर उसाने भरलेला ट्रक धडकून थेट उलटला आणि कार पूर्णपणे चिरडली. कारचा काही भाग शेजारी उभी असलेल्या युका डायग्नोस्टिक कंपनीच्या बसवर टेकला आणि याच आधारामुळे कारचालकाची जीवा-मरणाची लढाई पलटली. थरारक प्रसंगातून कारमधील सुनील रेडेकर हे अगदी सहीसलामत बचावले आणि पाहणारेही चकित झाले.

बसने रोखला मृत्यू
सायंकाळी साधारण सात वाजताची वेळ. पार्वती पार्क, कळंबा रोड येथे राहणारे रेडेकर हे रोजप्रमाणे त्यांच्या शॉपमधील काम आटोपून उद्यमनगरकडे जात होते. सायबर चौकात सिग्नल लागल्याने कार थांबवली इतक्यात मागून आलेला ट्रक डिव्हायडरवरून घसरला आणि थेट कारवर कोसळला. कारची पुढील बाजू पूर्णपणे चेपत एकीकडे बसवर अडकून राहिली. अपघात इतका भीषण होता की कारमध्ये कोण जिवंत राहिले असेल, असा प्रश्न पाहणाऱ्यांना पडला.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
पण चमत्कार झाला. बसचा टेकू मिळाल्याने रेडेकर यांचा जीव वाचला. क्षणभर त्यांनी स्वतःला संपलेलेच समजले होते. परंतु फुटलेल्या काचेतून त्यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न सुरू केला. याचवेळी पाठीमागे दुचाकीवरून जात असलेले सद्दाम देसाई आणि आशिष कदम हे धावत आले. देवदूत ठरलेल्या या दोन्ही तरुणांनी रेडेकर यांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
“मी जिवंत आहे यावर विश्वास बसत नाही”
रेडेकर यांच्या कारचा पुरता चेंदामेंदा झाला होता. वाहनाच्या लोखंडी ढिगाऱ्यातून ते जिवंत बाहेर आले हेच त्यांना पचत नव्हते. “वेदनेपेक्षा मी जिवंत राहिलो हेच समाधान,” ते म्हणाले.
टेम्पो चालकाचाही थरारक प्रसंग
या अपघातात टेम्पोचालक अभिषेक माळीही किरकोळ जखमी झाला. कागलहून किराणा माल घेऊन राजारामपुरीकडे जात असताना मागून आलेल्या ट्रकने टेम्पोला जोराची धडक दिली. पुढील वाहनाला धडकून टेम्पोचा पुढचा भाग आतमध्ये गेला. प्रसंगावधान राखत अभिषेकने केबिनमधून उडी मारून स्वतःचा जीव वाचवला. पायाला दुखापत झाली असली तरी तो म्हणाला, “जिवंत राहिलो हेच मोठं आहे.”
घटनास्थळी प्रचंड गर्दी
अपघाताची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आणि काही क्षणांत सायबर चौकात लोकांची गर्दी उसळली. पोलिसांनी वारंवार सूचना केल्या; पण गर्दी हटत नसल्याने बळाचा वापर करावा लागला. मदतकार्यात अडथळा निर्माण झाल्याची तक्रारही करताना दिसत होते.
रस्त्यावर वाहत होते डिझेल
धडकेनंतर कार आणि टेम्पोची इंधनटाकी फुटली. रस्त्यावरून डिझेल वाहत होते. आग लागण्याचा धोका लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने माती टाकून तो नियंत्रणात आणला. वाहतूक वळवून अपघातग्रस्त वाहने हटवण्यात आली.
१७ जणांचा थरारक बचाव
युका डायग्नोस्टिकची बस त्यावेळी १७ कर्मचाऱ्यांना कोल्हापूरात सोडण्यासाठी येत होती. मागून आलेला ट्रक त्यांच्या दिशेने कोसळताना दिसताच संपूर्ण बस हादरली. पण वेळ चांगली होती. सर्वजण बचावले. अन्यथा जीवितहानी टाळणे अवघड होते.
ट्रक चालकाचा दावा – गतीचा अंदाज आला नाही
ट्रक चालक प्रदीप सुतार हा ऊस भरून निघाला होता. उतारावर गाडी वेगात गेली आणि गिअर बदलताना नियंत्रण सुटले, असा त्याचा दावा आहे. या एका चुकीने अनेकांचे प्राण धोक्यात आले.
आपत्कालीन यंत्रणा कुठे होती?
मोठ्या अपघातांत तातडीची मदत दिसावी अशी अपेक्षा असते. परंतु घटनास्थळी आपत्कालीन यंत्रणा दिसली नाही. नागरिकांमध्ये याच चर्चा रंगल्या. शहरात वारंवार होणाऱ्या अपघातांनंतरही प्रशासनाची धीम्या गतीने होणारी प्रतिक्रिया प्रश्न निर्माण करते.
सायबर चौकातील हा अपघात एक चमत्काराच ठरला. लोखंडाच्या ढिगाऱ्याखाली दबूनही बसचा टेकू मिळाल्याने एक जीव वाचला. मृत्यू दाराशी आला आणि एका क्षणात थांबला – पाहणाऱ्यांनाही हा प्रसंग विसरणे कठीण आहे.