जास्तीत जास्त लोकांनी आपले मत नोंदवावे- डॉ.नरेंद्र जाधव

छत्रपती संभाजीनगर /
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्याबाबत राज्य शासनाने गठीत केलेल्या डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीची आज छत्रपती संभाजीनगर येथे एमआयटी महाविद्यालयात आनंद सभागृहात विभागीय संवाद बैठक पार पडली. शिक्षण, भाषा, बालकांचे मानसशास्त्र, संस्थाचालक, पालक, पत्रकार इ, क्षेत्रातील ३५० हून अधिक लोक यावेळी उपस्थित होते.
समाजातील विविधस्तरातील घटकांनी समिती समोर आपली मते नोंदवावी. त्यासाठी वेबसाईटवर मते नोंदविण्याचा पर्याय आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी यावेळी बोलतांना केले.

समितीचे सदस्य डॉ. अपर्णा मॉरीस, डॉ. मधुश्री सावजी, संजय डोरलेकर यावेळी उपस्थित होते. बैठकीस विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, शिक्षण उपसंचालक कैलास दातखीळ, शिक्षणाधिकारी (प्राथ) जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी (माध्य) आश्विनी लाठकर, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे, सतीश सातव, डॉ. मुनीश शर्मा,भारत पालवे, प्रियाराणी पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन झाले. त्यानंतर समितीच्या कामकाजास सुरुवात झाली.

उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, नोंदविलेले सर्व अभिप्राय, मते एकत्रित करून समिती शासनाकडे अहवाल सादर करणार आहे. विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने व्यक्त होता यावे, सादरीकरण आणि संभाषण करता यावे यासाठी त्यांना योग्य भाषाज्ञान दिले पाहिजे. शिक्षकांनी या माध्यमातूनच त्या भाषा शिकविल्या पाहिजेत. यानिमित्त भाषा शिक्षणाबाबत लोकांचे म्हणणे ऐकून सर्व माहितीचे पृथ्थकरण करुन समिती लवकरच आपला अहवाल शासनाला देईल,असेही डॉ. जाधव यांनी सांगितले.

संकेतस्थळावरही आपले मत नोंदविता येईल
कोणती भाषा कोणत्या वर्गापासून सुरू करावी याबाबतचे अभिप्राय, मत नोंदवण्याचे काम नागरिकांनी www.tribhashasamiti.org.in या संकेतस्थळावर प्रश्नावली, मतावली भरून करावे, असे आवाहनही डॉ. जाधव यांनी यावेळी केले.
विविध मान्यवरांचे म्हणणे सादर
समितीबरोबर जिल्ह्यातील सामान्य नागरिक, भाषातज्ज्ञ, विचारवंत, मराठी भाषेशी संबंधित शासकीय तसेच अशासकीय, खासगी संस्था त्यांचे अध्यक्ष, सदस्य, लोकप्रतिनिधी, शिक्षक, पालक, पत्रकार इत्यादींनी संवाद साधला. त्यात प्रामुख्याने श्रीकांत उमरीकर, डॉ. रामचंद्र काळुंखे, प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, मिर्झा अब्दुल कय्युम , डॉ. दत्तात्र्य डुंबरे,सुमित खांबेकर, डॉ. गणेश मोहिते. डॉ. मनोज ठाकूर तसेच अनेक मान्यवरांचा सहभाग होता. याशिवाय बाहेरील जिल्ह्यातील लोकांशी समितीने दुरदृष्य प्रणालीद्वारेही संवाद साधला.
मराठी भाषा पाहिलीपासून असावी, तसेच इंग्रजी भाषा पण असावी, हिंदी भाषा कोणत्या वर्गापासून असावी, संगणकीय भाषेचा समावेश कधी करावा, भाषा किती आणि कोणत्या वर्षापासून शिकवण्यात याव्यात तसेच अन्य भाषांचा अंतर्भाव केव्हा करावा याबाबत उपस्थितांनी आपल्या सुचना मांडल्या. समितीने या सर्व सुचनांची नोंद घेतली.