सोलापूर : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम सुरू असतानाच ऊस दर जाहीर न करणाऱ्या साखर कारखान्यांना आता प्रशासनाकडून स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. ‘दर जाहीर करा, अन्यथा गाळप बंद करण्याची वेळ येईल’, असा कठोर संदेश माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिल्यानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कारखान्यांवर पाठपुरावा सुरू असून ३४ पैकी १९ साखर कारखान्यांनी आपला ऊस दर जाहीर केला आहे. उर्वरित १५ कारखान्यांना नोटिसा बजावण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी दिले आहेत.

जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी ऊस दर न जाहीर करता गाळप हंगामाला सुरुवात केल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींना गांभीर्याने घेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी १४ व १७ नोव्हेंबर रोजी कारखानदारांसोबत बैठक घेत, ३० नोव्हेंबरपर्यंत दर जाहीर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र अनेकांनी त्याची दखल न घेतल्याने आता प्रशासनाचा पवित्रा अधिक कडक झाला आहे.
उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्या माहितीनुसार, दर जाहीर न करणाऱ्या सर्व कारखान्यांना फोनद्वारे दररोज संपर्क साधला जात आहे. तसेच साखर आयुक्तांना या संपूर्ण पाठपुराव्याचा अहवाल पाठविण्यात आला आहे. दर न जाहीर करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई होऊ शकते, असा इशाराच प्रशासनाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरीही आता दर कधी जाहीर होणार याकडे लक्ष ठेवून आहेत.
दर जाहीर केलेले १९ साखर कारखाने व दर (रु. प्रति टन)
जकराया साखर कारखाना – ३१५०
विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना, करकंब – ३१५०
बबनरावजी शिंदे साखर कारखाना – ३००१
येडेश्वरी अॅग्रो कारखाना – ३००१
श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना – २८८५
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना – २८५०
श्री संत कुर्मदास साखर कारखाना – २८५०
ओंकार साखर कारखाना, चांदापुरी – २८५०
आष्टी साखर कारखाना – २८५०
विठ्ठल रिफाइंड साखर कारखाना – २८७५
शिवगिरी अॅग्रो साखर कारखाना – २८७५
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना – २९००
माळीनगर साखर कारखाना – २८००
विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना – २८००
ओंकार कार्पोरेशन, म्हैसगाव – २८००
भैरवनाथ साखर कारखाना – २८००
राजवी अॅग्रो पॉवर – २८००
सिताराम महाराज साखर कारखाना – २८००
श्री शंकर सहकारी साखर कारखाना – २८०० प्लस
यामध्ये सर्वाधिक ऊस दर ३१५० रुपये देणारे जकराया साखर कारखाना व विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना, करकंब हे दोन्ही कारखाने ठरले आहेत.
ऊस दर अद्याप न जाहीर केलेले १५ साखर कारखाने
आवताडे साखर कारखाना, नंदूर
धाराशिव साखर कारखाना, सांगोला
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना
भीमा सहकारी साखर कारखाना
व्हीपी साखर कारखाना
जयहिंद साखर कारखाना
श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना
लोकनेते बाबुराव पाटील कारखाना
लोकमंगल अॅग्रो, बीबीदारफळ
लोकमंगल साखर कारखाना, भंडारकवठे
सिद्धनाथ साखर कारखाना, तिऱ्हे
इंद्रेश्वर साखर कारखाना
युटोपियन साखर कारखाना
गोकुळ साखर कारखाना
जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, यासाठी प्रशासनाकडून सुरू झालेल्या हालचालींना आता वेग आला आहे. दर जाहीर केलेल्या कारखान्यांची संख्या वाढत असली तरी उर्वरित १५ कारखाने दर जाहीर करत नाहीत, तोपर्यंत शेतकऱ्यांची अस्वस्थता कायम राहणार आहे.